१ जून १९४८ - पहिली एसटी बस पुणे-अहमदनगर मार्गावर धावली.
बीएसआरटीसीची (बाँबे स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन) पहिली बस यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. लाकडी बॉडी आणि आजूबाजूला कापडी कव्हर लावलेली ती बस होती. त्यावेळी देखील अवैध वाहतूक होती, त्यांच्याकडून एसटीवर हल्ला होण्याची शक्यता असल्याने पोलिस बंदोबस्तात माळीवाडा ते पुणे अशी बस नेता आली. हीच त्या काळातील राज्य परिवहन म्हणजे आजच्या एसटीची सुरुवात होती. पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निझाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरु राहिला.
साडेपंधरा हजार बसेसचा ताफा, दररोज १७ हजार मार्गांवर ७० हजार प्रवाशांना सेवा, अगदी खेड्यापाड्यांपासून ते महानगरांपर्यंत सुमारे एक हजार थांबे, २४७ आगारे…..आणि वर्षाकाठी फायदा झालाच तर जेमतेम पाच कोटी रूपयांचा……….महाराष्ट्रातील विशेषत: ग्रामीण भागातील प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या राज्य परिवहन मंहामंडळाची म्हणजेच सर्वसाधारण भाषेतील ‘एसटी‘ची ही बोलकी आकडेवारी आहे. महाराष्ट्रातील ८० टक्के जनता अद्यापही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर म्हणजेच एसटीवर अवलंबून आहेत. व्यवहारात लोक जिला “लाल डबा’असे संबोधतात ती एसटीची बस राज्याच्या अगदी दुर्गम भागातील वाड्यावस्त्यांपासून ते थेट नगरे-महानगरांपर्यंत पोहोचते. एसटीचे हे भक्कम आणि विस्तीर्ण जाळेच लाल डब्याच्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण आहे. शासकीय म्हणून भरवशाची सेवा, माफक दर आणि विनम्र कर्मचारी ही सुद्धा एसटीची वैशिष्टे म्हटली पाहिजेत. एस टी च्या स्थापनेच्या दिवसापासून आजतागायत ‘एसटी’च्या ज्या समस्या आहेत त्या कायम आहेत . ‘एसटी’ला  ना स्वायतता , ना  ही कुठल्या प्रकारच्या सवलती, उलट एस टी  विविध सवलती प्रवासांना देते आहे. महामंडळ अनेक सामाजिक बंधने पाळून प्रवाशांकरता सोई पुरवते, भाड्यामध्ये सवलत देते. स्पर्धेत बाजी मारण्यासाठी संपूर्ण राज्यभर असलेले विस्तीर्ण जाळे ही एसटीची महत्त्वपूर्ण जमेची बाब आहे. ‘गाव तेथे रस्ता अन रस्ता तेथे एसटी’ हे ब्रीद वाक्य महामंडळाने ९९% खरे केले आहे. सर्व खासगी प्रवासी कंपन्यांनी एकत्र येऊन ठरवले तरी त्यांना एवढ्या खेड्यापाड्यांपर्यंत बससेवा सुरू करता येणार नाही.
लाल डबा हे लोकांचं तसं आवडीचं नाव. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर कुठेही जायचं असेल तर प्रायव्हेट बसगाडय़ांची काही कमतरता नाही. तरीही सुरक्षेच्या दृष्टीने ‘गडया… अपुला लाल डबाच बरा!’ असं म्हणत आपण एसटीलाच प्राधान्य देतो. अशा या महामंडळाचे डेपो असलेलं मोठं आगार म्हणजे मुंबई सेंट्रलचं आगार होय. असा हा मुंबई सेंट्रलचा डेपो सगळ्यात जुना आणि पहिल्या क्रमांकाचा डेपो म्हणूनच ओळखला जातो.पश्चिम रेल्वे स्थानकाच्या समोरच असलेला राज्य परिवहन मंडळाचा हा मुंबई सेंट्रलचा डेपो म्हणजे मुख्यालय आहे. या डेपोची स्थापना १९५० साली झाली. मुंबई सेंट्रलचा भाग हा मध्यवर्ती असल्याने तिथेच मोठी जागा घेतली आणि या सगळ्या बसेस एकाच छताखाली आल्या. हळूहळू बसेसची संख्या वाढू लागली आणि इथला लोड वाढला. त्यामुळे नंतर परेल (६०च्या दरम्यान) आणि कुर्ला डेपोची निर्मिती झाली.
एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणे आताशा काही प्रमाणात कमी प्रतीचे मानले जावू लागले. शहरी भागातल्या प्रवाशांमध्ये तर एसटी महामंडळाबद्दल उणे बोलणे म्हणजे फॅशन झाल्यासारखे वाटते. एस.टी.वर टीका करताना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, जे मार्ग फायद्याचे नाहीत त्या मार्गावरही नुकसान सोसून एस.टी. ची गाडी धावते आहे. ज्या खासगी वाहतूकदारांची तरफदारी लोक करीत आहेत, ते खासगी वाहतूकवाले जेवढे फायद्याचे मार्ग, त्या फायद्याच्या मार्गावरच त्यांच्या गाडय़ा चालवतात.या खासगी वाहतूकदारांना एस.टी.सारखी स्टँण्डसाठी गुंतवणूक करावी लागत नाही. त्यांचे ‘थांबे’ नाहीत. आपल्या बापाच्या मालकीचा रस्ता आहे, असे समजून या खासगी गाडय़ा रस्त्यावरच उभ्या असतात, तिथेच प्रवासी भरतात. एस.टी.मध्ये एक लाख कामगार आहेत. १० मध्यवर्ती गॅरेज आहेत. तिथल्या कामगारांना नेहमी पगार आहे, युनिफॉर्म आहे, कामगार क्षेत्रातला बोनस आहे, हक्काच्या रजा आहेत. एस.टी.मध्ये स्वातंत्र्यसैनिकांना मोफत प्रवास आहे, विद्यार्थ्यांना सवलती आहेत. सामाजिक बांधिलकीची सर्वात मोठी जाण महाराष्ट्रातल्या एस.टी.नेच ठेवलेली आहे. यापैकी कसलीही जबाबदारी खासगी वाहतूकदार घेत नाहीत. त्यांच्या तिकिटांचे दर त्यांना हवे तेव्हा वाढवतात. त्यावर कोणताही निर्बंध नाही, परिवहन खात्याला ते जुमानत नाहीत.
महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाचे प्रवासाचे सर्वात त्यामानाने स्वस्त आणि सोयीचे वाहतुकीचे साधन म्हणून खेडय़ा-पाडय़ात एस. टी. हेच सगळय़ात मोठे साधन आहे. कित्येक दुर्गम ठिकाणी एसटी तोटा सहन करून चालवली जाते ती फक्त प्रवाशांच्या प्रवास सुविधेकरीता. केवळ सामाजिक दृष्टीनेच महामंडळ याकडे पाहत आलेले आहे. सरकार काही वेळा कर सवलत अन इतर नियमांमध्ये महामंडळालाही सुट देत नाही. या एसटीच्या डेपोचं वैशिष्टय़ म्हणजे जो कधीही झोपलेला किंवा शांत आढळणार नाही. सतत वर्दळ असते. म्हणजे या ठिकाणी २४ तास एसटी बसेसची ये-जा सुरू असते. कधी रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळी गावी जाण्यासाठी डेपोला गेलात तर तुम्हाला जवळपास दोनशे गाडया या डेपोमध्ये विश्रांती घेत उभ्या दिसतील.  हे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची आगारे म्हणजे  चोवीस तास चाकरमान्यांची अविरत सेवा सुरू असते. कधीतरी एसटीची ही दिवस अन् रात्रीची धावपळ पाहायला एखादा तरी या आगारांत फेरफटका मारायला हवा.